नाशिक (वृत्तसंस्था) परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाले आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता भर पडली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे दर घसरत असल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात आठशे ते हजार रुपयांनी कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचा आरोप केला जात आहे.काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवल्यानं मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला होता. त्यानंतर लिलाव सुरू झाले आणि कांद्याला दरही चांगला मिळाल्यानं शेतकरी सुखावला होता.
मात्र,आता पुन्हा एकदा कांद्याचे दर घसरू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सरासरी कांद्याला साडेतीन ते साडेचार हजार रुपये क्विंटल मागे सध्या दर मिळत आहे. आणखी भाव घसरला तर कांद्याला कमी भाव मिळणार आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे.