मुंबई (वृत्तसंस्था) संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु होताच विरोधकांनी इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावर जोरदार हंगामा केला. शेतकरी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन काँग्रेससोबत अकाली आणि बसपाचे खासदार आक्रमक झाले होते. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु विरोधी पक्ष दलित, महिला आणि ओबीसी लोक मंत्री बनवण्याच्या चर्चा पचवित नाहीत. मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मंत्रीमंडळाची ओळख करून देत असताना ही टीका केली. हा गोंधळ पाहून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोनादरम्यान मृत्यू पावलेल्या खासदारांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच विरोधकांच्या गदारोळानंतर बिर्ला यांनी हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला.
मोदी म्हणाले, मी आशा करतो की तुम्ही सगळ्यांनी लसीचा एकतरी डोस घेतला असेल. तरीही तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोक कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल, असे मोदी यांनी म्हटले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावेळी त्यांनी लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.