चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील तावसे बु॥ येथील रहिवासी अशोक चौधरी, धनराज चौधरी, आशाबाई पाटिल व आळंदी स्थित असलेले, वारकरी संप्रदायाचे सचिव ह.भ.प. नरहरी चौधरी या चार भावंडांनी यांचे आईवडील मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय श्रोतेविना कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
भारतीय संस्कृतीत मातृपितृदेवोभव:, आचार्य देवोभव:,अतिथीदेवोभव: या त्री सुत्रीस अनन्य साधारण महत्व आहे.माणसाच्या जन्मानंतर आईच्या कुशीत दूध पितांना संस्कारांचे शिक्षण मिळते म्हणून आईवडील हे पहिले विद्यापीठ आहे आणि ही संस्कारांची शिदोरी माणसाच्या आयुष्यभर उपयोगी पडते. प्रत्येक मुलावर माता पित्यांचे थोर उपकार असतात. म्हणून आई,वडीलच खरे गुरू आहेत.ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले त्या माता पित्यांची आयुष्यभर सेवा करणारी काही मुले आज देखील या भौतिक जगात बघायला मिळतात. आजच्या बदलत्या काळात परंपरागत एकत्र कुटुंबाची व्यवस्था मोडकळीस आली.
हम दो हमारे दो ह्या पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार झाल्याने आई,वडीलांपासून मुले दूर गेली आहेत. त्यामुळे आई,वडिलांवर एकटे राहण्याची वेळ आली आहे.हे जरी खरे असले तरी आज आई – वडिलांना देवासमान मानणारी मुले,मुली व सुना बघायला मिळत आहेत.परंतू समाजात याचे प्रमाण खूपच नगण्य आहे.आज ही ग्रामीण भागात बहुतांश कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धत असून,आई,वडीलांचा मानसन्मान व आदर केला जात आहे.त्या तुलनेत शहराच्या संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्था नेस्तनाबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.माणसाच्या जीवनात पैसा व संपत्तीने सुख व समाधान मिळत नाही तर आई – वडीलांच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध होत असते.