मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटके आणि हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयए या संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. तसेच, एका मुलाखतीत अनिल देशमुख यांनी आमच्या पोलिसांच्या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या, अशी कबुली दिली होती. त्या पार्श्वभूमीवर परमबीर सिंग यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन पत्र लिहित गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला देशमुखांनी ट्विट करत तत्काळ उत्तर दिले आहे.
अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरण हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून स्पष्ट होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.
परमबीर सिंग यांनी पत्रात काय आरोप केलेत?
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे.
राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत.
फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला १०० कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत १ हजार ७५० बार, रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून ४० ते ५० कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांना जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे.
अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे.