चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या युवती सभेअंतर्गत विद्यार्थीनींसाठी ‘व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे’ आयोजन आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै.ना. अक्कासाहेब शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा आशाताई विजय पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या उदघाटक डॉ. वैशाली पाटील (संचालक, IMRD, शिरपूर) ह्या होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी, प्रमुख वक्ते डॉ. सविता जाधव (शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चोपडा), डॉ. आर. आर. पाटील व डॉ. सी. आर. देवरे तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी उपप्राचार्य प्रा.डॉ. व्ही. टी. पाटील, उपप्राचार्य डॉ. के. एन सोनवणे, युवती सभा प्रमुख डॉ. पी. एम. रावतोळे व के. एस. क्षिरसागर आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना युवतीसभा प्रमुख डॉ. पी. एम. रावतोळे म्हणाल्या की, ‘युवतींनी आपला पोशाख व राहणीमानाबद्दल फार सजग असायला हवे कारण त्यामुळेच व्यक्तिमत्त्व अधिक खुलते. त्याचबरोबर आपण आपली विचारांची ऊंची वाढवली तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. यावेळी प्रमुख वक्त्यांचा परिचय के. एस. क्षिरसागर यांनी करून दिला. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ. वैशाली पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘व्यक्तिमत्व विकास जीवनाचा अविभाज्य भाग असून विद्यार्थिनींनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असायला हवे.’ यावेळी त्यांनी विविध जीवनमूल्ये व अंगभूत कौशल्ये कोणती व ती कशी वृद्धिंगत करू शकतो यावर सखोल असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘आपल्यातील न्यूनगंड दूर सारून उत्तम शिक्षण घ्यायला पाहिजे. विविध वक्त्यांचे आदर्श विचार ऐकून त्यातून आपला व्यक्तिमत्व विकास साधायला हवा.’ याप्रसंगी वक्त्या डॉ.सौ.सविता जाधव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ‘व्यक्तिमत्व विकासामध्ये आत्मपरीक्षण हा महत्त्वपूर्ण घटक असून, आंतरबाह्य व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला पाहिजे.’ यावेळी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोण वृद्धिंगत केला पाहिजे व स्वतःच SWOT analysis करावं असे नमूद केले.
याप्रसंगी वक्ते डॉ. आर. आर. पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोनाच्या विकासाच्या अवस्था व परिणाम यावर प्रकाश टाकला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, ‘व्यक्तिमत्त्व विकास आंतरबाह्य दृष्टीने होणे आवश्यक आहे व त्याच बरोबर मूल्यशिक्षणही फार गरजेचे आहे’. यावेळी वक्ते डॉ. सी. आर. देवरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ‘कसे बोलावे ?, किती बोलावे? हे एक कौशल्य आहे. कमीत कमी बोलावे व जास्तीत जास्त एकावे ज्यामुळे आकलन क्षमता विकसित करून व्यक्तिमत्व विकास साधता येतो. तसेच साधी राहणी, उच्च विचासरणी हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे.’
यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वच मार्गदर्शकांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याचे नमूद केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन एस. बी. पाटील यांनी केले तर आभार संगीता पाटील यांनी मानले. विद्यार्थ्यांची नोंदणीसाठी आरती पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. ए. वाघ, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी. डी. कर्दपवार, एम. बी.पाटील, पूजा पुन्नासे, कु. स्नेहा राजपूत, शाहीन पठाण, राजू निकम, विजय शुक्ल, अमोल पवार यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेप्रसंगी विविध महाविद्यालयातील ५८ विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील व्ही पी. हौसे, बी. एच. देवरे, ए. एच साळुंखे, संदीप देवरे, एस. बी. पाटील तसेच शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
















