धरणगाव (प्रतिनिधी) प्रत्येक सण-उत्सवात जातीय सलोखा व एकतेचे दर्शन घडविणाऱ्या धरणगावकरांनी गणेशोत्सवातही आपला भाईचारा कायम राखला आहे. कोट बाजारावरून जाणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी आज स्वागत केले.
गतकाळातील काही घटनांमुळे अतिसंवेदनशीलशहर म्हणून धरणगावकडे बघितले जात होते. परंतू अनेक वर्षांप्रमाणे शहराची आजही शांतता टिकून आहे. एकमेकांच्या सण व उत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या धरणगावातील सर्वधर्मीयांनी आपली परंपरा गणेशोत्सवातही कायम ठेवली आहे. आज रात्री शहरातील गणेश मंडळांची मिरवणूक कोट बाजारावर येताच ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच पाण्याच्या बाटल्या आणि नाश्त्याची पाकीटही देण्यात आली. एवढेच नव्हे तर बाप्पाच्या मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनीही ठेका धरला होता. दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे देखील आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह हजर होते. पो.नि. ढमाले यांनी गणेश मंडळातील भक्तांसह मुस्लीम बांधवाचेही कौतुक केले. तसेच धरणगावकरांमधील भाईचारा बघून आपण भारावलो असून हा भाईचारा असाच कायम रहावा, अशा शुभेच्छा दिल्यात.