धरणगाव(प्रतिनिधी) : सन्मानाने योग्य जागा मिळाल्यास आघाडीसोबत राहू. मात्र, योग्य जागा न नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आहे. ऐनवेळी आघाडी न झाल्यास वेगळे लढू व पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास एकत्र लढू, अशी माहिती माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली.
धरणगाव शहराचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प झाला आहे. धावडा येथील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन तेथील गाळ काढण्याचे काम त्वरित सुरू करावे. यासाठी नगरपालिकेला निवेदन दिले आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावर्षी गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत रब्बी पिकासाठी पाणी सोडावे, असे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. तसेच पाटचाऱ्या स्वच्छ कराव्यात, संजय गांधी निराधार योजना नवीन प्रकरणे मंजूर करावीत, अशी मागणी धनराज माळी यांनी केली. धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून टँकर सुरू करा, अशी मागणी शहराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केली. तसेच बालकवी स्मारक, क्रीडा संकुल ही कामे अनेक वर्षे रखडली आहेत, ती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पूर्ण करावी, अशी मागणी शहराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, अरविंद देवरे, तालुकाध्यक्ष धनराज माळी, नीलेश चौधरी, मनोज पाटील, संभाजी कंखरे, सागर वाजपेयी, सीताराम मराठे, सुमित मराठे, नारायण चौधरी, भूपेंद्र पाटील, दिनेश भदाणे, अजय महाजन उपस्थित होते.