जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि 29 वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज वाघुर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळे उभारणे बाबतची बैठक संपन्न झाली . यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता य.का. भदाणे , कृषी विभागाचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाघुर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
वाघुर प्रकल्पाच्या सातव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवाला नुसार जामनेर तालुक्यातील वाघुर प्रकल्पाच्या 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित आहेत. शेततळे तयार करणे व शेततळ्यातुन सुक्ष्म सिंचन, पाणी वापराबाबत शेतक-यांसोबत करार करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.
सदरची कामे चालु वर्षात सुरु करण्याचे नियोजन आहे.शेततळ्याच्या माध्यमातुन शेतक-यांना हवे त्यावेळी पाणी मिळणार आहे त्यामुळे शेतीउत्पादन वाढीस मदत होईल तसेच शेततळ्यामध्ये मत्सउत्पादन, शेततळ्याच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मीती अशा विविध बांबीचा अंतर्भाव करुन शेतक-यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
भविष्यातील पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी या भागात सुक्ष्म सिंचनाला चालना देण्याचे नियोजन आहे. शेतक-यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी 10,100 हेक्टर वर राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर शेततळे उभारण्याचे नियोजन आहे.
साधारण 5 हेक्टर क्षेत्रात 1 शेततळे (16 गुंठे आकाराचे) त्यामध्ये 27 लक्ष लिटर पाणी साठा व तो दर 25 दिवसांनी शेतक-यांच्या मागणी प्रमाणे शेततळे भरुन देण्याचे नियोजन राहणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.