जळगाव (प्रतिनिधी) सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) आर.एल. ज्वेलर्सवर धाड टाकून शोरुममध्ये असलेला संपूर्ण सोन्याचा साठा व ८७ लाख रुपये ताब्यात घेतले (सीझ) केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, आर. एल. चे संचालक ईश्वरलाल जैन, मनिष जैन यांच्यासह मनिष यांच्या दोन्ही मुलांना समन्स बजावून चौकशीसाठी इडीने बोलावले आहे. दरम्यान, स्टेट बँककडून घेतलेल्या कर्जाबाबत ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ‘ईडीने साधारणतः ८७ लाखांचा माल सीझ केल्याची माहिती दिली. तसेच वास्तविक कर्ज प्रकरणांशी या दोन्ही फर्मचा कुठलाही संबध नाही, त्या माझ्या नातवांच्या नावावर आहे, त्यांनी कुठल्या ही बँकेचे कर्ज घेतले नाही. कायदेशिररित्या माल सिझ करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
आर. एल. ज्वेलर्सवर काल ईडीच्या विविध आस्थापनांवर ईडीने छापेमारी करत लाखोंचा माल सीझ केला आहे. तसेच काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहे. याबाबत शुक्रवारी माजी खा. ईश्वरलाल जैन यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, एसबीआयकडून मी कर्ज घेतले होते. त्या प्रकरणाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. एसबीआयने एफआयआर दाखल केली होती.
आम्ही कर्ज रीस्ट्रक्चर करण्याचा प्रस्ताव दिला तो त्यांनी फेटाळला. त्यानंतर सीबीआयने देखील चौकशी केली. मात्र सुप्रिम कोर्टाच्या फॉरेन्सीक ऑडीटचा दाखला देत आम्ही लढा देत आहोत. आज ईडीने छापेमारी केली त्या फर्म नातवांच्या नावाने आहे. त्यांचा कर्जाशी संबंध नाही. तरी माल सीझ करण्यात आला. मला ईडीने समन्स दिले आहे. त्याचे उत्तर देवू न्यायालयात जावू न्याय मिळेल, असेही खा.ईश्वरलाल जैन म्हणाले.
दरम्यान, आरएल ज्वेलर्स या फर्मने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सुमारे ८ ते १० वर्षांपूर्वी ५०० कोटीचे चार टक्के व्याजाने सोने कर्ज घेतले होते. बँकेने ते कर्ज सीसी लोनमध्ये रुपांतरित करून १८ टक्के व्याज आकारणी केली. हे आर. एल. फर्मला मान्य नाही. तसेच बँकेने ८- कोटी रुपये टॅक्स पोटी वळते करणे, चुकीचे असल्याचे ईश्वरलाल जैन यांचे म्हणणे आहे. त्या एफआयआर नुसार दोन दिवसापासून ईडीचे सुमारे २५ अधिकाऱ्यांचे पथक आरएल- ज्वेलर्सच्या जुन्या व्यवहरांची चौकशी करत होते.