अंबरनाथ (वृत्तसंस्था) ‘राज्यसभा (RajyaSabha) निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला, मात्र विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केलं आहे. अंबरनाथ शहरात एका कौटुंबिक भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आले होते. त्यावेळी खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यसभेत सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. खडसे म्हणाले, ‘राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. जो अतिआत्मविश्वास होता किंवा ज्याप्रमाणे दुर्लक्ष झालं. ते आता दुर्लक्ष करता काम नये ही एक शिकवण आम्हाला त्यातून मिळाली. मात्र शेवटी पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा जरी झाला तरी महाविकास आघाडीचा पराभव म्हणून तो जिव्हारी लागल्यासारखा आहे, असं खडसे म्हणाले.
पुढे खडसे म्हणाले, ‘ आता विधानपरिषदेला दूध पिण्याच्या आधी ताकही फुंकून प्यावं लागतं तशाप्रकारे आता विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे, असं खडसे म्हणाले. ‘गाफील राहून मागचा पराजय झाला, अशी कबुली देत आता अधिक गाफील न राहता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा विजय संपादित करायचा आहे, त्यामुळे सर्वांनी आता मागच्या पराभवाचा धडा घेऊन आता विधानपरिषदेच्या रणनीती ठरवण्याचं ठरवलेलं आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.