नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अदानी समूहाने विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच ‘अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावला होता. शिवसैनिकांनी हा फलक उखडून फेकला. यानंतर शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.
यावेळी राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात देण्यात आलेल्या शिथिलतेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यातला धोका अजूनही संपलेला नाही. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्ण अधिक आहे. त्यामुळे पुण्याच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसेल. याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच अधिक बोलतील. मुंबईतही लोकल सुरू नाही. रेस्टॉरंट बंद आहे. निर्बंध मुंबईतही आहेत. फक्त दुकानांच्या वेळेत फरक आहे, असं त्यांनी सांगितलं.
अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का ?
छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच नाही, तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते. यापूर्वी येथे जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.