मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता करत आपल्या फेसबुक अकाउंटवरून ती शेअर केली आहे. या कवितेमध्ये आव्हाड यांनी भाजपने महाराष्ट्रातील संचारबंदीला विरोध केल्यामुळे भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. या कवितेचं शीर्षक ‘खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ असं देऊन आव्हाड यांनी ही कविता फेसबुकवर शेअर करताच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. मात्र, भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी कवितेतून खरपूस समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. ही कविता फेसबुकवर शेअर करण्यात आली आहे.
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही.
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले .
निर्णय घेताना घेतले
विश्वासात.
विरोधकांचे त्यामुळेच
फावले..
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले.
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले.
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या.
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या.
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको.
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव..
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय.
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय.
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय.
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ..
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
ना क्लीन चिट देता आली.
ना खोटी आकडे वारी देता आली.
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली.
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय.
उठसूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय.
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!
अशा आशयाची कविता जितेंद्र आव्हाड यांनी शेअर करताच ती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी मात्र या कवितेकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. कारण, यामध्ये आव्हाडांनी आपल्या विशेष शैलित विरोधकांवर टीका केली आहे.