मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. संबंधित महिलेने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही याची गांभीर्याने दखल घेतली होती. परंतु पोलिसांच्या तपासात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही सिद्ध झालं तरच पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. आता संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने गुन्हा दाखल करु नये अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.