जळगाव (प्रतिनिधी) शिवाजीनगर पटेल वाडीतील रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल यांनी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि शिवाजीनगर पटेल वाडी भागात गणेश मूर्ती बनविण्याचे कारखाने बऱ्याच प्रमाणात आहेत. येथील मूर्तिकारांना आपल्या गणेश मूर्ती त्यांच्या कारखान्यातून बाहेरगावी विक्रीसाठी नेण्याकरता वाहनातून घेऊन जावे लागतात आणि या परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर चिखल पसरलेला आहे अशा रस्त्यातून या मूर्तिकारांना आपली वाहने नेण्या आणण्यास खूपच त्रासदायक होत आहे आणि त्यात गणेश मूर्तींची तुटफुट होत आहे.
तसेच अनेक गणेश भक्त आणि ठिक ठिकाणांहून गणेश मंडळांचे कार्यकर्ते सुद्धा गणेश मुर्ती घेण्याकरता या कारखान्यांवर येत असतात. अशावेळी त्यांना रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेतेमुळे गणेश मूर्ती नेण्यास खूप त्रासदायक परिस्थिती निर्माण होते आणि त्यात जर गणेशमूर्तींची तुटफुटत झाली तर गणेश भक्तांच्या धार्मिक भावना ही दुखावतात. अगोदर या रस्त्यासाठी निवेदन दिलेली आहे. या परिसरातील राहणा-या नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून शिवाजी नगर पटेल वाडी येथील नागला किराणा ते राजू पाटील यांच्या गणपती कारखान्यापर्यंत असलेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, असे यात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल, शिवसेना कार्यालय प्रमुख संजय सांगळे, समाज सेवक गणेश भाऊ मोझर, उपजिल्हाप्रमुख छावा संघटनेचे किरण ठाकूर, मधुकर साबळे आदी उपस्थित होते.