सोलापूर (वृत्तसंस्था) राज्यात काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. त्यानंतर आता माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनाम्याबाबत खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला, असा खुलासा त्यांनी केला आहे.
पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
त्यानंतर आता ‘मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राठोड बोलत होते. “मी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. मी त्या पक्षात आहे. नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटलं आरोप झाले जे काही होऊल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी,” असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.