नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे सोशल मीडिया विभागातील नॅशनल कनव्हेअर असणाऱ्या गुजरातच्या सरल पटेल यांनी मोदींनी केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केल्याचं सांगितलं आहे. पटेल यांनी ट्विटरवरुन ऑनलाइन अर्जाची प्रत पोस्ट केली आहे. मोदींनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्यासंदर्भातील अधिक माहिती मागवणारा आरटीआय अर्ज केला, असं पटेल यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारपासून सुरु झालेला बांगलादेश दौरा पाहिल्याच दिवशी मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे. मात्र आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय. सोशल मीडियावर यावरुन दोन्ही बाजूचे समर्थक विरोधक आमने सामने एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच एका काँग्रेसच्या नेत्याने मोदींच्या या वक्तव्यानंतर थेट भारत सरकारकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मोदींनी केलेल्या दाव्यासंदर्भातील तपशील मागवला आहे. काँग्रेसचे सोशल मीडिया विभागातील नॅशनल कनव्हेअर असणाऱ्या गुजरातच्या सरल पटेल यांनी ट्विटरवरुन मोदींनी केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केल्याचं सांगितलं आहे. पटेल यांनी ट्विटरवरुन ऑनलाइन अर्जाची प्रत पोस्ट केली आहे. “पंतप्रधान कार्यालयाकडे मोदींनी आज बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्यासंदर्भातील अधिक माहिती मागवणारा आरटीआय अर्ज केला,” असं पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “मला या संदर्भात जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. कोणत्या कायद्या अंतर्गत मोदींनी अटक करण्यात आली. त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आलं हे मला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल ना?,” असा प्रश्न त्यांच्या फॉलोअर्सला विचारलाय.
बांगलादेश स्वातंत्र्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह केला होता
सावर येथील भाषणामध्ये मोदींनी बांगलादेश स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन आणि अटकेचा उल्लेख केला. “मी बांगलादेशातील बंधू, भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं मोदी म्हणाले.