नवी दिल्ली (वृत्तसंस्था) साऊथ सुपरस्टार (South Actress) साई पल्लवीविरुद्ध (Sai Pallavi) हैद्राबादमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘काश्मिरी पंडितांचं पलायन’ आणि ‘गौरक्षण’ बाबत अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या नेत्यांनी अभिनेत्रीविरोधात सुलतान बाजार पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अलीकडेच एका मुलाखती दरम्यान साई पल्लवीने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा संदर्भ देत म्हणाली की, चित्रपटात त्यावेळी काश्मिरी पंडितांची हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे? ज्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. तिने व्यक्त केलेल्या या व्यक्तव्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचं मत योग्य असल्याचे म्हटले आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. साई पल्लवीने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे त्यानंतर ती वादात सापडली.
काय म्हणाली साई पल्लवी?
मुलाखतीत बोलताना साई पल्लवी म्हणली की, ‘मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंग बद्दल खूप ऐकले आहे, पण कोण बरोबर आणि कोण चूक, हे मी सांगू शकत नाही. काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते, हे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, त्याचवेळी काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याला जय श्री रामचा नारा लावण्यास सांगितले गेले, ही सुद्धा धर्माच्या नावावर होणारी हिंसा आहे. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?