मुंबई (वृत्तसंस्था) केवळ एका राज्यापुरता कर्नाटकचा प्रश्न मर्यादित नसून तो दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना हे कळले पाहिजे. थोडा इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे, असे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, कर्नाटकच्या सरकारने हे सुद्धा आता विसरु नये, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा असल्याचे म्हटले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काल सांगितले. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते उपस्थित होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना हे कळाले पाहिजे. थोडा इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे आमचे कानडी बांधव मुंबई, महाराष्ट्रात राहतात, त्यांच्यावर आम्ही कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही येथे कानडी शाळा चालवतो. कानडी शाळांना आम्ही अनुदान देतो. येथे अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असे कधी कुणाला म्हणत नाही.
संजय राऊत कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, एकदा मुंबईत, महाराष्ट्रात कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी यावे आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. येथे उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे काम करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांचे जर येथे मतदान घेतले, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातच आले पाहिजे.