मुंबई (वृत्तसंस्था) अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिस आज अर्णब गोस्वामीला अलिबाग न्यायालयात हजर करणार आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांना धागेदोरे मिळाले असतील त्यांनी कारवाई केली आहे.
याच्याशी सरकारचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. हा काळा दिन कसा असेल पत्रकाराने सुद्धा मर्यादा पाळली पाहिजे सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे. अर्णव गोस्वामी यांना अटक म्हणजे पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारितेसाठी हा काळा दिवस नसल्याचं म्हटलं आहे. राज्यात पत्रकार आणि पत्रकारिता अशा कुणालाही धोका नाही. आम्हीही पत्रकार आहोत. चुकीचं काही केलं नसेल तर जोरजोरात ओरडण्याची गरज लागत नाही, असा टोला राऊत यांनी गोस्वामींना लगावला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणीदरम्यान संबंधित चॅनेलवर टिप्पणी केली होती. त्या दिवसालाही काळा दिवस म्हणणार का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळायला हव्या, असा सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.