जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २४ मे, २०२१ च्या मध्यरात्रीपासून ते ७ जून, २०२१ च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) लागू करण्यात येत आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कलम ३७ (१) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागू असणार नाही. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही. परंतु जिल्हादंडाकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्र. दंडप्र -01/ कावि/801/2021 दि. १५ मे, २०२१ मधील अटी लागु राहतील.
वरील संपूर्ण आदेश हे शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हे आदेश दिनांक २४ मे, २०२१ चे रात्री १.०० वाजेपासून ते दिनांक ७ जून, २०२१ चे रात्री १२.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही अप्पर जिल्हादंडाधिकारी पाटील यांनी कळविले आहे.