जळगाव (प्रतिनिधी) शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्री करणाऱ्या मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर येथे अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून ५ हजार रुपये किंमतीचे ५ कापूस बियाणे पाकिटे जप्त केल्याची माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर चे मालक जितेंद्र दिनकर पाटील, अंमळनेर यांचेविरुध्द बियाणे नियम १९६८ व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ नुसार अमळनेर पोलीस स्टेशन येथे २२७/२०२१ देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वैभव शिदे, तालुका कृषि अधिकारी, अमळनेर भरत वारे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, जिल्हा परिषद, जळगाव, अमोल भदाणे, कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती, अमळनेर गणेश पाटील, व कृषि सहाय्यक अमळनेर यांच्या सहकार्याने पार पडल्याचे ठाकूर यांनी कळविले आहे.