भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील बालाजी लॉनमागील शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचार्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. दोन जणांचा खून झाल्याची माहिती समोर येताच शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली.
भुसावळ शहरातील बालाजी लॉनमागील शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचार्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. दोघांचा खून का करण्यात आला?, याचे नेमकं कारण समोर आले नसले तरी, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. आराध्या हेमंत भूषण (23) व सुशीलादेवी भूषण (63) अशी मयतांची नावे आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तथा रेल्वे कर्मचारी हेमंत श्रवणकुमार भूषण यास अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरु केली आहे.
संशयित हेमंत श्रवणकुमार भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. पत्नी आवडत नसल्याने त्याचे मंगळवारी मध्यरात्री भांडण झाले व आईने वादात मध्यस्थी केल्याने त्याने 63 वर्षीय आईचा तसेच 24 वर्षीय पत्नीचा डोक्यात लोखंडी वस्तू मारून निर्घृण खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतू दोघांच्या खुनाचे नेमकं कारण पोलीस चौकशीतूनच समोर येणार आहे.
पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या आरोपी हेमंतला पत्नी आराध्या आवडत नसल्याने त्यांच्यात या ना त्या कारणावरून नेहमीच खटके उडत असल्याचे कळते. दाम्पत्याला वाद मिटवण्यासाठी आरोपीचा शालक ऋषभ (26) हा सोमवारीच मुंबई येथून भुसावळात आला होता. मात्र, मंगळवारी पहाटे पती-पत्नीमध्ये कुठल्यातरी कारणावरून जोरदार कडाक्याचे भांडण झाले व आरोपीने हेमंतने संतापाच्या भरात लोखंडी वस्तूने आईसह पत्नीच्या डोक्यात मारल्याने दोघांचा अतिरक्तस्त्राव होवून जागीच मृत्यू झाला. तर शालक ऋषभ हा देखील हा देखील या हल्ल्यात जखमी झाला. ऋषभने हा प्रकार स्थानिक बाजारपेठ पोलिसांना कळवला.
















