जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत के श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि.प. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने आज मुख्य तक्रारदारासोबत शाळेला भेट दिली. यावेळी समितील सदस्यांनी चौकशीसाठी आवश्यक असलेले दप्तर तयार ठेवण्याचे आदेश शाळा प्रशासनाला दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, तालुक्यातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत के श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा या शाळेत शालेय पोषण आहार योजना सुरु झाल्यापासून सदर शाळेने शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेतलेला असून शासनाकडुन पुरविण्यात येत असलेला तांदुळ पुरवठादाराकडुन पुरविण्यात येत असलेला धाण्यादी माल स्विकारलेला आहे. तसेच इंधन खर्च, भाजीपाला खर्च, अन्न शिजविण्याचा खर्च व पुरक आहार या सर्व बाबींचे शासन स्तरावरुन आलेले शासकीय अनुदान या सर्व बार्बीपासुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवून त्याचा योग्य विनीयोग न करता शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून संपूर्ण योजनेचा शासन स्तरावरुन आलेल्या शासकीय रकमेचा शासन स्तरावरुन आलेल्या शासकीय तांदुळ तसेच धान्यादी मालाचा खोटे कागदपत्र तयार करुन अपहार केलेला आहे. त्यानुसार शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि.प. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.
या चौकशी समितीतील सतीश चौधरी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती,जळगाव) , शामकांत एच नाहळदे (लेखा अधिकारी (शापोआ), शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. जळगाव), अजित ह. तडवी (अधिक्षक (शापोआ), पंचायत समिती, रावेर) हे आज मुख्य तक्रारदार रवींद्र शिंदे यांना सोबत शानबाग विद्यालयात पोहचले. यावेळी चौकशी समितीतील सदस्यांनी शालेय प्रशासनाला चौकशी करिता लागणारे दप्तर तसेच कोणाचे जाबजबाब घ्यायचे आहे?, यासंबंधी सांगितले. तसेच चौकशीच्या पुढील तारखेला सर्व कागदपत्रे व दप्तर तयार ठेवण्यासंबंधी आदेश दिले आहेत.