मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी लिहिलेल्या पत्रावरून मोजक्या शब्दात पवार यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, चर्चाच सुरू आहे. त्याबद्दल मला माहिती नाही. पण आताच्या राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्याकडे व्यक्त केली आहे. खुद्द राज्यपालांच्या कार्यालयातूनच तसं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची कोणत्याही क्षणी उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी नवे राज्यपाल म्हणून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.