चंद्रपूर (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला आणि सोमवारी दुपारी संतप्त शिवसैनिकांनी चंद्रपुरातील पीकविमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत साहित्याची तोडफोड केली.
विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे कार्यालय फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्याकडून यापूर्वीच देण्यात आला होता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टी बाधितचा अहवाल देऊनही अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. दोन लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने निधी मंजूर करावा, रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीचा मदत मिळालेली नाही, या नुकसानभरपाईसह शिवसेना जिल्हाधिका-यांमार्फत शासनाला निवेदन देत लक्ष वेधले.
यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांत सहारे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव, उपजिल्हा प्रमुख शालिक फाले, बल्लारपूर शहर प्रमुख प्रकाश पाठक, माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, तालुका प्रमुख संतोष नरुले, मूल तालुका प्रमुख प्रशांत गडूवार, तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडुरवार, जिल्हा संघटिका उज्ज्वला नलगे, युवतीसेना जिल्हाधिकारी रोहिणी पाटील, विनय धोबे, सुमित अग्रवाल, हेमराज बावणे, बाळू भगत, बाबा साहू, राहुल विरुटकर, विकास विरूटकर, सिक्की खान, महेश खंगार, रिझवान पठाण, शहाबाज शेख, शिवा वझरकर, वैभव काळे गिरीश कटारे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.