मुंबई (वृत्तसंस्था) भाजप युवा मोर्चाने सूचित करूनच हे आंदोलन केले असून शिवसैनिकांनी मात्र पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. यावरून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने पुकारलेल्या फटकार मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेनंतर भाजप आमदार आशीष शेलार हे देखील माहिम पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी देखील मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात, त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते’, असे म्हणत यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असेही शेलार यांनी म्हटले आहे.
या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी निष्पक्ष काम करावे अशी अपेक्षा आहे असे शेलार म्हणाले. या घटनेनंतर आता पोलिसांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर असे झाले नाही तर हे आंदोलन आणखी वाढेल, असा इशाराही शेलार यांनी दिला. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही शेलार म्हणाले.
‘राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे?’
यावेळी भाजप आमदार आशीष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे हे आम्हाला अजूनही कळत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेवर टीका करत असताना ‘देखो ये दिवानो ऐसा काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’, अशा खोचक शब्दात शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे.