धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव बस स्थानकाजवळून एका इनोव्हा कारमधून तीन लाख ५६ हजार ९०८ रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नाश्ता करायला गेले आणि सोने गमावून बसले !
याबाबत इम्रान शरिफ खान (वय 37 वर्ष, धंदा- ट्रॅव्हल कंपनी, रा. गणेशपुरी मेहरुण जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा आय. के ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यांच्याकडे एमएच 15 ईपी 5002 या क्रमांकाची इनोव्हा कंपनीची कार आहे. दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास इम्रान खान हे जळगाव येथून नवीन ट्रॅव्हल गाडी घेणे करिता सुरत येथे जात होते. म्हणून त्यांनी खिशात रोख रक्कम व सोन्याचे दागिने गाडीच्या बॉक्समध्ये ठेवत मित्र वसिम अली बशारत अली (रा. तांबापुरा जळगाव) यांच्यासोबत सुरत येथे धरणगाव-अमळनेर मार्ग निघाले होते. 11 वाजेच्या सुमारास धरणगाव येथे बस स्टॅन्ड समोर हॉटेल जवळ इनोव्हा कार उभी करुन इम्रान खान आपल्या मित्रासह नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो. नाश्ता केल्यानंतर दोघं जण पुढील प्रवासाला निघाले. याच दरम्यान, अमळनेर येथे गाडीचा बॉक्स चेक केला असता इम्रान खान यांच्या लक्षात आले की, 112.200 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या कारच्या बॉक्समध्ये नाहीत. त्यामुळे इम्रान खान हे अमळनेर येथुन पुन्हा जळगावला परत आलेत. या प्रवासा दरम्यान खान हे फक्त धरणगाव येथेच थांबले होते.
कारचा दरवाजा कोणत्याही चाबीने उघडतो !
खानच्या यांच्या इनोव्हा कारचा दरवाजा कोणत्याही चाबीने उघडतो, हे त्यांच्याकडे पूर्वी कामाला असणाऱ्या बिलाल मोहम्मद वलीउद्दीन शेख (रा. उस्मानिया पार्क जळगाव) याला माहीत होते. त्यामुळे इम्रान खान यांनी त्याच्यावर संशय होता. इम्रान यांनी बरेच दिवस बिलालला शोधत काढले. परंतु तो कुठेही परिसरात आढळून आला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की,कारमधील बांगड्या बिलालनेच चोरी केलेल्या आहेत. या प्रकरणी बिलाल मोहम्मद वलीऊद्दीन शेख विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.