जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चागलेच सुनावले आहे. ‘कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आले पाहिजे, साध्या ‘कॉमन सेन्स’च्या गोष्टी देखील तुम्हाला माहीत नाहीत’, अशा शब्दांत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी जळगाव जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या कामकाजाचा आणि करोना विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांची आढावा बैठक येथील नियोजन भवनात घेतली. बैठकीस पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करावे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वोच्च ऑक्सिजन मागणीच्या तिप्पट ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे नियेाजन करावे, मास्क वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. कोविड काळात सेवा देणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचे देयक थकीत ठेवू नये यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. विविध विकासकामांत कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच बरोबर कृषि, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी खर्च करावा. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडू नये असेही त्यांनी सांगितले. शहराच्या रस्त्यांसाठी देण्यात आलेला निधी खर्च करून दर्जेदार रस्ते तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. तसेच अमृत योजनेच्या कामांमध्ये गलथानपणा सुरू आहे. या योजनेमुळे खोदल्या गेलेल्या रस्त्यांमुळे झालेल्या समस्येवरही तोडगा काढण्याची गरज आहे, असेही त्यांनी ठणकावले.