जळगाव (प्रतिनिधी) गाडीचे इंडिकेटर तुटल्याच्या कारणावरुन सहा जणांनी विकास प्रवीण पाटील (वय २९, रा. अमळनेर) याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता. एलसीबीच्या पथकाने तपासचक्रे फिरवित खून करणाऱ्या सहा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
अमळनेर येथील विकास पाटील यांच्याकडून दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास गाडीचे इंडिकेटर तुटले. त्या कारणावरुन विकास पाटील यांना अंमळगाव ते जळोद रोडवर अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, रोहीत सिताराम पाटील (रा. गंधाली व पिळोदा, ता. अमळनेर) यांनी मारहाण करुन त्यांचा खून केले होता. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाची पाहणीसह त्याठिकाणी मिळालेल्या पुराव्यांवरुन एलसीबीच्या तपासचक्रे फिरवले. त्यानुसार अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव तिघांना जामनेर तालुक्यातील नेरी येथून कमलाकर श्रीगणेश याला पाचोरा येथून तर रोहीत पाटील रा. गंधाली व मनोज श्रीगणेश रा. पिळोदा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, दीपक माळी, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, रविंद्र पाटील, भगवान पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहुल महाजन, जितेंद्र पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, भारत पाटील यांच्या पथकाने केली.