जळगाव प्रतिनिधी : विकसित भारत २०४७ चा पाया युवा पिढी आहे. परंपरागत व्यवसाय सांभाळायला कुणी तयार नाही. यामुळे परंपरागत व्यवसाय अडचणीत येत आहेत. या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देतांनाच स्टार्टअपच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रत्यक्ष साकारणाऱ्या तरुणाईलाही बळ देण्याची गरज आहे. स्वदेशी व स्वावलंबन या दोन संकल्पना आपण मनापासून स्विकारल्या तर भारताला महासत्ता होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, असा सुरु स्वदेशी जागरण मंचच्या देवगिरी प्रांतच्या बैठकीत उमटला.
स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान, देवगिरी प्रांतची प्रांत बैठक नुकतीच जळगाव येथे पार पडली. बैठकीचे उद्घाटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह स्वप्नील चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून स्वावलंबी भारत अभियानचे क्षेत्र समन्वयक विनय खटावकर, स्वदेशी जागरण मंचचे पश्चिम क्षेत्र संघटक मनोहरलाल अग्रवाल, प्रांत संयोजक शैलेश कंगळे, महिला कार्यप्रमुख योगिता माळवी उपस्थित होत्या. बैठकीदरम्यान जळगाव शहरातील पाच स्टार्टअप फाऊंडर्सचा सत्कार करण्यात आला. त्यांचे केळीची चिप्स पासून ड्रोन पर्यंतचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.
स्वप्नील चौधरी यांनी संघाच्या पंच परिवर्तनात स्वदेशीचे महत्व स्पष्ट करतांना ‘स्वा’धार या मुद्द्यावर प्रत्येक तरुणाने आणि सर्वांनी स्वाधारला महत्व देत आपल्याच देशाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मनोहरलाल अग्रवाल म्हणाले की, विकसीत भारत २०४७ चा पाया युवा पिढी आहे. भारताचा प्रत्येक युवक अभ्यासासोबतच उद्योजक बनला तर घरात पैसे येतील. त्याचा मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी होईल. युवकांनी आपले ध्येय निश्चित केले तर विकसित भारत २०४७ चे लक्ष साध्य होईल, असे मत व्यक्त केले. विनय खटावकर यांनी सांगितले की, स्वावलंबी भारत अभियान हे देशाला स्वावलंबी करून मजबूत करण्याचे एक ध्येय आहे. देश स्वावलंबी झाल्यास आपल्या देशाची प्रगती आपोआप होईल असे मत त्यांनी मांडले.
शैलेश कंगले यांनी प्रांतच्या कामगिरीचा आढावा मांडत आगामी काळातील रुपरेषा स्पष्ट केली. डॉ.युवराज परदेशी यांनी स्वदेशी मेळा आयोजनासह १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान स्वामी विवेकानंद जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या दरम्यान रन फॉर स्वदेशी, स्वदेशी संकल्प जोड उपक्रम आयोजित आदी विषयांवर मार्गदर्शन केले. बैठकीला देवगिरी प्रांतातील सर्व जिल्हा संयोजक व सहसंयोजक उपस्थित होते. सुत्रसंचालन कमलेश सोनवणे यांनी केले तर आभार विशाल राजूमामा भोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा सहसंयोजक गिरिश बर्वे, संपर्क प्रमुख अजिंक्य तोतला, निलेश वाणी, चेतन वाणी, तुषार भांबरे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
















