मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी दहा हजार कोटी रूपये मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. येत्या दिवाळीपर्यंत ही मदत संबंधितांपर्यंत पोहोचेल असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. परंतु, अद्यापही मदत न मिळाल्याने भाजप निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा’, असे म्हणत राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
निलेश राणे म्हणाले कि, ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी…नुसत बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशा भाषेत ठाकरे सरकारवर टीका केली.
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि फळ बागायतदारांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. पावसामुळे राज्यातील रस्ते आणि काही ठिकाणच्या पुलांचेही मोठे नुकसान झाले असून त्यासाठीही या निधीतून मदत दिली जाणार आहे.