पुणे (वृत्तसंस्था) बिहारच्या निकालांवरून देशभर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्व निकाल जाहीर व्हायला रात्री उशीर होणार असला तरी स्पष्ट कल आता जाहीर झाले आहेत. राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहारवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी आणि नितीश कुमार यांच्यातच थेट लढत होती. त्यामुळे आम्ही तिथे काही फारसं लक्ष घातलं नाही. तेजस्वी यादवला आम्ही मोकळीक दिली होती असंही पवारांनी सांगितलं.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या संथ मतमोजणीमुळे सध्या राज्यातील चित्र दोलायमान असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तेजस्वी यादवने ज्या प्रकारे लढत दिली ती युवकांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. नितीश कुमारांच्या जेडीयूला मोठा फटका बसेल असेलं असं बोललं जात होतं मात्र तसं होताना दिसत नाही असंही ते म्हणाले. भाजपला या निवडणुकीत चांगला फायदा झाला असं मतही त्यांनी व्यक्त केलं. बिहारमध्ये भाजपला देवेंद्र फडणवीसांमुळे फायदा झाला असं म्हटलं जातं, तुमचं मत काय आहे असा प्रश्न विचारल्यावर पवार आपल्या खास शैलीत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांमुळे चमत्कार झाला हा प्रकाश तुमच्यामुळे आमच्या डोक्यात पडला.