नाशिक (वृत्तसंस्था) दिल्लीतल्या डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टीका केली आहे. राज्य तुळीशीचे रोप आहे, भांग लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला.
“दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. तुम्ही संजय राऊतांवर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांधी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही”, असा दावा यावेळी संजय राऊतांनी केला.