मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी एसटी महामंडळ पुढं सरसावलं आहे. इतर राज्यांमधून ऑक्सिजनचे टँकर आणण्याचं काम एसटीचे चालक करतील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी ही माहिती दिली.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.
आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता, असं ते म्हणाले. तसेच ब्रुक फार्मावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान परब यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या पुरवठ्याचं काम केंद्राचं आहे. मग त्यांच्याकडे मागणी करावीच लागणार. राज्याला परवानगी दिली तर आम्ही त्यांना मागणार नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. कुणी औषधांचा साठा, काळाबाजर करत असेल तर त्यावर कारवाई होणारच हेही त्यांनी स्पष्ट केली.