जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे शैक्षणिक वर्ष २०२१ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण बंद आहेत, त्यामुळे अशा विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व परीक्षा नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नुकताच परीक्षा संदर्भात परिपत्रक काढले आहे. परंतु बॅकलॉग व अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांबाबत स्पष्टीकरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असून देखील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे, कोरोना महामारीची परिस्थिती पाहता विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे व परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या येत आहेत तरी विद्यार्थ्यांना हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून द्यावा.
विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे संगणक, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, किंवा नेटवर्क सुविधांच्या अभावामुळे परीक्षा देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांकरीता ऑफलाइन पद्धतीचा पर्याय देखील उपलब्ध करून द्यावा जेणेकरून एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, तसेच डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा काही विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाइन संकेतस्थळावर दिसत नसून, काही विद्यार्थ्यांना अनुपस्थित देखील दाखवण्यात आले आहे. अशा विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व परीक्षा नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, अभाविप महानगर मंत्री आदेश पाटील व संकेत सोनवणे आदी उपस्थित होते.