मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील रामगड येथे वीज कोसळून ९ शेळ्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (शुक्रवार) संध्याकाळी घडली. सायंकाळी विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात ९ शेळ्या ठार झाल्यात. परंतू सुदैवाने यात गुराखी थोडक्यात बचावला आहे.
रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावा लगत गेला होता. सायंकाळी साडे-चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारासाठी मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरपंच दत्ता पाटील यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उचंदे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.