मनवेल ता.यावल ( प्रतिनीधी ) कोरोना महामारीमुळे सुमारे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत . मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु केले . मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची स्मार्टफोन घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . त्यातच ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी समस्या असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूरच आहेत.
मनवेल थोरगव्हाण परिसरातील गावांमधील शाळांच्या माध्यमातून मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे . शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग , विषयानुसार सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत . त्यातून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण दिले जाते . मात्र हा ऑनलाईनशिक्षणाचा प्रयोग ग्रामीण भागासाठी अडचणीचा ठरत आहे . अनेक सर्वसामान्य पालकांकडे स्मार्टफोन नाहीत . अनेकांकडे स्मार्ट फोन घेण्यासाठी पैसेही नाहीत . फोन असणाऱ्यांकडे रिचार्ज करण्यासाठी वेळेवर पैसे उपलब्ध नाहीत. सध्या कवडीमोल दराने शेतमाल विकलाजात आहे . त्यामुळेही शेतकरी पालकांना स्मार्टफोन घेता येत नाही . काहींकडे स्मार्टफोन असेल तर नेटवर्क रेंज नसते . काही आई – वडील स्वत : चा फोन देत नाहीत. फोन उपलब्ध झाला तर काही विद्यार्थी वेळेवर क्लास अटेंड करत नाहीत. शासनाने टीव्ही चॅनलच्या माध्यमातून शिक्षणसर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली . मात्र अनेकांकडे तशा प्रकारचे डिश कनेक्शन नाही . त्यामुळे या उपक्रमाचा उपयोगही विद्यार्थ्यांना फारसा झाला नाही. ग्रामीण भागात तरी ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग फारसा यशस्वी होताना दिसत नाही.
ग्रामीण भागात शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी व्हॉट्सअप ग्रुपदेखील तयार करण्यात आले आहे . परंतु ते ग्रुप फक्त शोपीस म्हणून ठेवण्यात आले असल्याचे वास्तव विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे . यामुळे जे हुशार आहेत असे विद्यार्थी नाराजी व्यक्त करतात तर अभ्यास टाळणारे मात्र खूष होताना दिसून येत आहे .















