जळगाव (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांमधून वाढत असलेल्या तक्रारी आणि आपापसातील चढाओढीमुळे अमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील तीन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर फिर्याद घेतली नाही म्हणून हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शनिवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
तक्रारी वाढल्यामुळे तिघांची बदली !
अमळनेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून वाढल्या होत्या. तसेच त्यांच्यात आपसातील चढाओढीचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचली होती. तसेच अमळनेर येथील एका जणाच्या मृत्यूनंतर दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेशन विभागाने (सीआयडी) या तिघांना बोलावले होते. त्यानुसार दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेत तीनही कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात त्यांची बदली केली आहे. अमळनेर पोलिस ठाण्यातील शरद पाटील यांची भडगाव पोलिस ठाणे, दीपक माळी यांची बोदवड पोलिस ठाणे, रवींद्र पाटील यांची अडावद पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री काढले.
फिर्याद घेतली नाही म्हणून हेड कॉन्स्टेबलला निलंबित !
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीची तक्रार न घेतली नाही, तसेच संशयितावर कोणतीही कारवाई न करता कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलला पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. टॉवर चौक परिसरात एकाने कारचे दायर फाडले म्हणून कार चालक शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला आणि संशयिताची माहिती दिली, हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली नाही. तसेच संशयितावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून कारचालकाने याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. रेही यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत रेड्डी यांनी सोनार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.