जळगाव (प्रतिनिधी) महिलेची छेड काढल्याच्या संशयावरुन जमावाकडून भास्कर दगडू भंगाळे (वय ४३, रा. असोदा, ता. जळगाव) यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भंगाळे यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास असोदा गावातील एका परिसरात घडली. याप्रकरणी मयताविरुद्ध विनयभंगाचा तर मारहाण करणाऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील असोदा गावात भास्कर भंगाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. असोदा गावालगत त्यांची शेतजमिन असल्याने शेतीकरुन ते कुटुंबाचा उदनिार्वाह करीत होते. शेतात कामासाठी लागणारे मजूर आणण्यासाठी भंगाळे हे गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील एका परिसरात गेले होते. याठिकाणी त्यांनी महिलेची छेड काढल्याच्या संशयावरुन परिसरातील नागरिकांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर काही जणांनी थेट भंगाळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून बेदम मारहाण झाल्यामुळे भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी केले जिल्हा रुग्णालयात दाखल !
जमावाकडून झालेल्या मारहाणीत भास्कर भंगाळे यांच्या चेहऱ्यावर दुखापत होवून त्यांचा चेहरा सुजलेला होता. दरम्यान, या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना गावातील काही जणांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होणार मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट !
जमावाकडून मारहाण झाल्यामुळे मयत भास्कर भंगाळे यांच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या खूणा दिसत नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलिसांकडून देखील अधिक चौकशी केली जात होती. मयताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
नातेवाईकांसह ग्रामस्थांची जिल्हा रुग्णालयात धाव !
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह भंगाळे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात भंगाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयत भंगाळे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.
मयताविरुद्ध विनयभंगाचा तर सात जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा
पिडीत महिला घरात एकटीच असल्याचा फायदा घेत मयत भास्कर भंगाळे यांनी पिडीतेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी मयताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या महिलांसह पुरुष असे एकूण सात जणांविरुद्ध तालुका पोलीसात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मजूरांना अॅडव्हान्स देण्यासाठी भावाकडे केली होती पैशांची मागणी !
मयत भास्कर भंगाळे यांनी शेतात काम करणाऱ्या मजूरांना अॅडव्हान्स देण्यासाठी त्यांचे लहान भाऊ लिलाधर भंगाळे यांना पैशांसाठी फोन केला. मात्र ते बाहेरगावी जात असल्याने त्यांनी मी घरी आल्यानंतर पैसे देतो असे त्यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या काही वेळताच आपल्या भावाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे कळताच लिलाधर भंगाळे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी भावाचा मृतदेह बघताच त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
मारहाण करणाऱ्या महिलांसह पुरुषांना घेतले चौकशीसाठी ताब्यात !
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रदीप राजपुत, सुधाकर शिंदे, विलास शिंदे, प्रवीण पाटील, चेतन पाटील, ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी मारहाण करणाऱ्या महिला व पुरुषांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली जात होती