भुसावळ (प्रतिनिधी) सभा आणि भोंग्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. या सगळ्या गोंधळामध्ये राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे हा गोंधळ मनोरंजन म्हणून पाहा फार गांभीर्याने घेऊ नका असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
भुसावळमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. भुसावळमध्ये एका कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात व्यासपीठावरून देखील यासंदर्भात टीका केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसेंनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत नापअसंती व्यक्त केली. “सध्या राज्याच्या राजकारणात गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. एकमेकांवर टिका-टिप्पणी करत हा बोलला की त्याला उत्तर दे, तो बोलला की त्याला उत्तर दे असं सुरू आहे. अगदी खालच्या स्तरावर टीका-टिप्पणी सुरू आहे. गेल्या ४० वर्षांत मी अस काही अनुभवलं नव्हतं”, असं खडसे यावेळी म्हणाले.
हे जे काही चाललं आहे, ते मनोरंजन म्हणून पाहा. ते फार गांभीर्याने घेऊ नका. भोंगा काढला काय, राहिला काय, तुमचं पोट भरणार नाहीये”, असं आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केलं.