रायगड (वृत्तसंस्था) मुंबई गोवा हायवेवर लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरलेल्या तिघा तरुणांना ट्रेलरने उडवल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये एका तरुणाला जागीच प्राण गमवावे लागले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व मित्र अर्टिगा कारने ठाण्याहून मालवणला प्रवास करत होते. मात्र त्याआधीच एकाला नियतीने गाठलं. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या गाडीच्या पाठीमागे सहकुटुंब सहपरिवार असा लिहिलेला स्टिकर सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ठाण्याहून मालवणला जाणाऱ्या अर्टिगा (MH 04 GJ 9698) गाडीतील तिघे प्रवासी लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरले होते. त्यावेळी मुंबई बाजुने येणाऱ्या ट्रेलरने (MH 46 AF 5605) या तिघा जणांना उडवलं. त्यानंतर रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या त्यांच्या अर्टिगा कारलाही पाठीमागून धडक दिली. या अपघातात अमित विनोद कवळे, (वय २२ वर्ष, रा. ठाणे) या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर टेरेस करवालो (वय २२ वर्ष, रा. ठाणे) आणि रोहन जाधव (वय २२ वर्ष, रा. ठाणे) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.