जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारचे खान्देशकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. खान्देशात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाहीय. केवळ घोषणाबाजी आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम ठाकरे सरकार करतेय, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज राज्य सरकारवर केली आहे.
उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले ॲड. आशिष शेलार हे बुधवारी दुपारी जळगावात आले होते. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. कोरोनाचे संकट असो की वादळ, पूर यासारखी आपत्ती असो; राज्यातील ठाकरे सरकारने शेतकरी किंवा सर्वसामान्य माणसाला जगवण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत. दुर्दैवाने ज्यांचे मृत्यू झाले, त्यांचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे. जे आकडे हे सरकार जाहीर करते, त्यात पण लपवाछपवी असते, अशी टीका ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
यावेळी ॲड. शेलार पुढे म्हणाले की, राज्य सरकारचे खान्देशकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असताना माहिती मिळाली की, खान्देशात सुमारे १० हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. केवळ घोषणाबाजी आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना पक्षांतराच्या मुद्द्यावरून टोला लगावला. ‘एकनाथ खडसे यांचा विषय जुना झाला आहे. त्यांच्यावर मी आता बोलत नाही. मात्र, ज्यांनी भाजप सोडला, त्यांची दुर्गतीच झाली आहे. एखादे मोठे झाड पडले की त्याच्या आजूबाजूला पडझड होतेच. पण ती तात्कालिक असते. येत्या निवडणुकांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही शेलार म्हटले. आमदार गिरीश महाजन यांना डावलले जात असल्याच्या मुद्यावर बोलताना आमदार शेलार म्हणाले की, आमदार महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाचा नाही. राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.