औरंगाबाद (वृत्तसंस्था) पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचे कारण सांगून त्यांनी ते नाकारले. भविष्यात सत्ता येईल की नाही, असे नाथाभाऊंना वाटले. त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले असावे, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
दानवे पुढे म्हणाले की, जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे, सुरशे भोळे आणि गिरीश महाजन यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व नगरमध्येही आमच्याकडे सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे कसे होणार, असा प्रश्न अनेकांना पडायचा. भाजपमध्येही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंत कोण?, असा प्रश्न विचारला जायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने भाजप पक्ष थांबलेला नाही. एका नेत्याच्या जाण्याने पक्ष कधीच थांबत नाही. भाजपकडे असंख्य कार्यकर्त्यांची फळी असल्याने नेतृत्त्वाची ही पोकळी भरुन निघेल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.