औरंगाबाद (वृत्तसंस्था) काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला, त्यांच्या हा मोर्चा पाण्यासाठी नव्हता, त्यांचा हा मोर्चा सत्ता गेली म्हणून होता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. आज मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये इथला पाणीप्रश्न बिकट झाला होता. या आधी पाच- दहा दिवसांनंतर पाणी यायचं, ते आता कमी झालं आहे. जुनी योजना आहे ती गंजून-सडून गेली आहे. संभाजीनगरसाठीच्या नवी योजना मी पूर्ण करणार, त्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. इथल्या योजनेला एक पैसाही कमी पडू देणार नाही. कंत्राटदार जर यामध्ये वेळकाढूपणा करत असेल तर त्याला तुरुंगात टाका असा आदेश दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकला तो आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे, उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. मी पाणी प्रश्नावर बोलणार आहे, पाठ न दाखवता पाणी प्रश्न असतानाही मी जनतेसमोर जातोय, हा प्रामाणिक पणा आहे. शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.