मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून एसटी महामंडळ प्रशासनाने १००० च्यावर एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. दरम्यान, आता २५०० नव्या उमेदवारांना तातडीने कामवर रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे नवे उमेदवार रुजू होईल, असे संकेत मिळत आहेत.
ज्या दोन ते अडीच हजार उमेदवारांची एसटी महामंडळाने आधी परीक्षा घेतली आहे. तसेच वाहन चाचण्या घेतल्या आहेत, त्या उमेदवारांना संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी. महामंडळाकडून तातडीने रुजू केले जाणार आहे. मात्र, कर्मचारी संपावर अद्याप ठाम आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, ही त्यांची मागणी कायम आहे. दरम्यान, पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. तर पुणे आणि नाशिक येथून शिवनेरी, शिवशाही बस पुणे आणि मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून पुणे येथे शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कंडक्टर संपावर असल्याने अधिकारीच बुकिंग करत आहेत. कंत्राटी चालकांना घेऊन शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईसाठी शिवनेरी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भाडे तत्वावर घेतलेल्या २ शिवनेरी डेपोत लावल्या आहेत. नियंत्रककाकडून बुकिंग सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, यावर संपकरी कर्मचारी नाराज झाले आहेत.