राजस्थान (वृत्तसंस्था) राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावात शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसचा विजेच्या तारांशी संपर्क आल्याने बस आगीच्या विळख्यात अडकली. तसेच २० पेक्षा जास्त प्रवाशांना विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. या दुर्घनटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.
जालौरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सात गंभीर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय अन्य १३ प्रवाशांवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार प्रवाशांनी भरलेली ही बस रस्ता चुकल्याने गावात पोहचली होती. ही बस मांडोलीहून ब्यावरकडे निघाली होती. मात्र रात्री रस्ता चुकल्याने ती महेशपुरा गावात आली होती. त्यानंतर गावातील वीज तारांशी संपर्क झाल्याने बसने पेट घेतला व भीषण दुर्घटना घडली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याकडे लक्ष दिलं.