जळगाव (प्रतिनिधी) तीन दिवसांपूर्वी कामावर ठेवलेल्या कारागिराने ९ लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याप्रकरणी दोन महिन्यानंतर शनि पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जुन्या गावातील बदाम गल्लीतील सोने कारागिरांचा ठेकेदार सुभाशीष पंचानंद धारा (वय ३३, मु. रा. खानाकुल, हुगळी) यांच्याकडे रतन तारापदा मांझी (रा. चोकचायपाट, ता. दासपुर, मिदीनापुर, पं. बंगाल) हा कारागीर कामाला लागला. १० नोव्हेंबर २०२३ रोजी त्याला सुभाशीषने १६२.९३७ ग्रॅम सोन्याची लड दिली आणि डाय पाडून आणण्यासाठी शालकासोबत दुचाकीवर पाठवले. सुभाशीषचा साला दुसऱ्या कामासाठी निघून गेला आणि त्यानंतर रतन सोने व दुचाकी घेऊन पसार झाला.
सुभाशीषने रतनच्या घरी संपर्क करून त्याला सोने परत करण्यास सांगितले. त्यानंतर रतन ९ डिसेंबरला जळगावात आला पण, सोने आणले नाही. परंतू सोने परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने उलटूनही सोने परत देत नसल्याचे लक्षात येताच धारा यांनी शुक्रवारी तक्रार दिल्यावर शनि पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.