झाडग्राम : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस हे बुडते जहाज बनले आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाबरोबरच तृणमूल व ‘इंडिया’ आघाडीचा पराभव निश्चित झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
पश्चिम बंगालच्या झाडग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस व तृणमूलवर जोरदार हल्ला चढवला. जलपाईगुडी येथील रामकृष्ण मिशन आश्रमावर झालेल्या हल्ल्याचा मोदींनी निषेध केला. स्वतःच्या वोट बँकच्या राजकारणासाठी तृणमूल काँग्रेसने त्यांच्या गुंडांना संतांविरुद्ध दहशतीचे वातावरण बनवण्याची मोकळीक दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाच्या सन्याशांना धमक्या देत आहेत. म्हणूनच रामकृष्ण मिशनच्या आश्रमावर हल्ला करण्यापर्यंत तृणमूलच्या गुंडांनी मजल मारली, अशा शब्दांत नरेंद्र मोदी कडाडले. तृणमूलने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा विडा उचलला आहे. पण बंगालची जनता हे अजिबात खपवून घेणार नाही, असेही मोदींनी ठणकावले.
दुसरीकडे पुरुलिया जिल्ह्यातील सभेला संबोधित करताना मोदींनी इस्कॉन, रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाविरोधात अपप्रचार करण्यावरून तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तत्पूर्वी ओडिशाच्या ढेंगनाळ मतदारसंघातील अंगुल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, ओडिशातील सत्तारूढ बीजू जनता दल (बीजद) सरकारला यंदाच्या निवडणुकीत निरोप मिळणार आहे. बीजदने घडवलेल्या विनाशामुळे जनता दुःखी आहे. ओडिशात खनिज संपत्ती विपुल प्रमाणावर आहे. तरीही येथील जनता त्रस्त आहे. मग ओडिशाच्या बिकट परिस्थितीला कोण जबाबदार आहे ? असा सवाल करीत मोदींनी बीजदला फैलावर घेतले आहे. ओडिशातील बीजद सरकार काही भ्रष्ट लोकांच्या नियंत्रणात आहे. मूठभर लोकांनी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थानावर कब्जा केला आहे. बीजदचे छोटे कार्यकर्ते सुद्धा कोट्यधीश बनले आहेत, अशी तोफ मोदींनी डागली.