जळगाव (प्रतिनिधी) पीक विमा प्रश्नी राज्य सरकारने सगळे केल्यानंतर रक्षाताई खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे, अशा शब्दात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षताई खडसेंवर टीकास्त्र सोडले आहे.
केळी पीक विम्याचे निकष राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहेत. दि. १८ जून रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना व भाजपत श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरून भाजपा खासदार रक्षा खडसेंवर टीकास्त्र सोडले. ना. पाटील काल सायंकाळी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात यांनीच राज्य सरकारवर आगपाखड केली होती. राज्य सरकारला काही कळत नसल्याची टीका केली होती. आता राज्य सरकारने याप्रश्नी प्रयत्न केले. एकीकडे भाजपचेच खासदार उन्मेष पाटील मान्य करत आहेत. तर दुसरीकडे खासदार रक्षा खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे. वाटायला लागलं इथं लग्न आहे, की हे लगेच वाजा घेऊन उभे राहतात’, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसेंवर टीका केली आहे. दरम्यान, ‘हे श्रेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाचे आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या चाचपणीबाबत विचारणा केली असता पाटलांनी काँग्रेसला चिमटा काढला. ‘काय नारा द्यावा, हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे. आजतरी महाविकास आघाडीचे सरकार तीन जणांचे मिळून सुरू आहे. हे सरकार ५ वर्षे आपले राज्य चालवणार आहे. उद्या शिवसेनेने काय भूमिका जाहीर करावी, हे उद्धव ठाकरेंचे मत असणार आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीबाबत काय भूमिका मांडावी, हे त्यांचे मत असेल. तसे मत काँग्रेसने मांडले आहे. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. काळजी करू नये. ज्यांना गुदगुल्या होत आहेत, त्यांनी गुदगुल्यांची वाट पाहावी’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.