अहमदनगर (वृत्तसंस्था) एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
७० हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. एकनाथ खडसे हे यातील प्रमुख साक्षीदार असल्यामुळे प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. पण एकही आमदार त्यांच्या सोबत गेला नाही असे म्हणत राष्ट्रवादी पक्षात कोणतीही भरती होणार नाही, असे स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिले आहे.
राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचा देखील समाचार घेतला. विधानसभा निवडणूक होऊन १ वर्ष झाले मात्र १ वर्षात रोहित पवार यांनी फक्त कोंबड्यांची पिल्ले, बी बियाणे इकडे आणून विकले आहेत. यापलीकडे देखील कोणताही विकास केला नाही, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार हे समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता, त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र एक वर्षानंतर ‘बारामती पॅटर्न’ सपशेल अपयश ठरला असून लोकांची घोर निराशा झाली आहे, असेही शिंदे म्हणाले